सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामांतर “ईश्वरपूर” करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून “ईश्वरपूर” करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव “ईश्वरपूर” असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे निवेदन संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केले.
पाटील यांनी निवेदनात म्हटले की, गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, याप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर “ईश्वरपूर” असे करण्यात येईल.
इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं, अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यावर पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. वारंवार या मागणीसाठी बरीचं आंदोलने निवेदने देखील देण्यात आली आहेत. आता महायुती सरकारकडून इस्लामपूर शहराचं नाव उरुण ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला असून, तो केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.