अर्जुनवाडमध्ये भाजप महायुतीचे शक्तीप्रदर्शन; महायुतीला विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अर्जुनवाडमध्ये आवाहन
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि शिरोळ पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुनवाड येथे चौक सभेद्वारे मतदार बांधवांशी संवाद साधला. सभेच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी स्वराज्य सेनेने भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पाटील म्हणाले, कोल्हापूर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असून, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एफआरपी कायद्यामुळे शेतकऱ्यांना हमीपेक्षा जास्त दर मिळण्याचा मार्ग खुला केला. झोनबंदी उठवल्याने शेतकऱ्यांना ऊस कुठेही विक्रीची मोकळीक मिळाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छतागृह बांधणी, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान योजना आणि ‘लखपती दीदी’सारख्या उपक्रमांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून शिरोळ तालुक्यातील हजारो महिलांना थेट लाभ मिळत आहे. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी अर्थसंकल्पातून SHE Mart सारख्या संकल्पना राबविल्या जाणार असून महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे. त्यामुळे मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, वर्षाताई पाटील, अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, शिवाजी खोद्रे यांच्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.