प्रशासनाने कामांच्या केवळ सूचना न देता पाठपुरावा करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली येथे महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केल्यास शहराचा विकास अधिक वेगाने साध्य होईल, असे मार्गदर्शन पाटील यांनी केले. तसेच प्रशासनाने केवळ सूचना न देता कामांचा सातत्याने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले रस्ते, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आवाहन पाटील यांनी केले. केवळ योजना आखून किंवा सूचना देऊन थांबू नका, तर प्रत्यक्ष कामाचा सातत्याने पाठपुरावा करा, अशा कडक सूचना पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अतुल माने, शहर अध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपा नेत्या जयश्री वहिनी पाटील, पृथ्वीराज पाटील, दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, पांडुरंग कोरे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.