पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला ‘मन की बात’मधील प्रेरणादायी संदेशांचा अनुभव
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय मासिक कार्यक्रमाचा 125 वा भाग पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत दूरदर्शनवर पाहिला. कार्यक्रमातील समाजजागृती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, नवकल्पना, जलसंधारण आणि राष्ट्रविकासातील जनसहभाग यांसारख्या विषयांवरील संदेशांचा आढावा घेत, शासनाच्या विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून व्यक्त केलेल्या विचारांतून समाजातील सकारात्मक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, नवकल्पना, स्वच्छता, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, युवा सहभाग तसेच देशाच्या विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या योगदानाबाबत विचारांची माहिती उपस्थितांना मिळाली.