एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

4

सांगली, २४ ऑगस्ट : दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हेच केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे व भावी पिढी सुरक्षित ठेवणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सांगलीकर नागरिकाने “एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया व अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया, हा संकल्प करावा”, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानअंतर्गत नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विटा येथे ३० कोटींचा अमली पदार्थांचा साठा सापडला होता. तेव्हा याबाबतची जिल्ह्यातील अस्वस्थता संपवण्यासाठी प्रशासन व प्रतिबंध, प्रबोधन व समुपदेशन ही त्रिसूत्री ठेवून अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा हे अभियान हाती घेतले. त्यातून गेली दीड वर्षे विविध उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

विविध उपक्रमांची माहिती सांगताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थाबाबतची माहिती देणाऱ्याना तसेच तसेच अमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांना बक्षीस देऊन शाबासकी दिली. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून ६०० शिक्षकांना व हजारो विद्यार्थांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था करण्यात आली. अशा अनेक संयुक्त उपक्रमातून व्यापक जनजागृती झाल्याने जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यात यश येत असल्याचे दिसत आहे. ते यापुढेही कायम ठेवण्यासाठी निर्धारपूर्वक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले, निराशा व रिकामेपणातून व्यसन लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, अभिनय व लाठी काठीचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाची तरतूद करू, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले. यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
“नशामुक्त सांगली – एकत्रित पाऊल, निरोगी भविष्य” या अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘नशामुक्ती निर्धार पदयात्रे’ला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात नशाविरोधी संदेश देणारे फलक, ओठांवर जनजागृतीच्या घोषणा आणि मनात नशामुक्त समाजाचा निर्धार घेऊन पदयात्रेत सहभागी झालेल्याचे पाऊल पडत होते. पदयात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीफीतीद्वारे दिलेली अमली पदार्थविरोधी शपथ घेत उपस्थितांनी नशामुक्त सांगलीचा सामूहिक संकल्प केला. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कल्पद्रुम मैदान ते पोलीस मुख्यालय या मार्गे काढण्यात आलेली पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.