बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान – भास्कर जाधव
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/10/modi-3-750x430.jpg)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना-भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी थेट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदी यांचे अस्तित्व कधीच संपले असते , अशी टीका भाजपवर केली आहे . सावर्डे येथील एका मेळाव्यात जाधव बोलत होते .
१९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झाले. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात,” असे भास्कर जाधव म्हणाले.
शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी आज समाचार घेतला. ‘ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी 86 तासांचं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सरकार कोणी बनवलं ? भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला? तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का? हे सांगावं, असा थेट सवाल जाधव यांनी फडणवीसांना विचारला.