कंगना चुकीचंच बोलली, पण 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव – चंद्रकांत पाटील

मुंबई: “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून कंगना राणावत आणि भाजपावर टीका केली जात आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने थोडी जरी लाज लज्जा असेल तर देशाची माफी मागावी.
या वक्तव्यावरुन सर्वच स्तरातून आता तिच्यावर टीका सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंगनाचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचंच आहे. पण 2014 पासून ज्या प्रकारे सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव मिळतोय त्यावरुन कंगनाने आपल्या भावना व्यक्त केल्या असतील.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
कंगना राणौतच्या भावना काय आहेत ते मला माहित नाही. परंतु वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. अशाप्रकारे देशाच्या स्वातंत्र्यावर निगेटिव्ह टिप्पणी करणं याची कोणाला परवानगी नाही.’ ‘परंतु एखाद्या वेळेस मोदींच्या 2014 पासूनच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव मिळतोय प्रामुख्याने सर्वसामान्य माणसांना. दोन वेळचं जेवणच मिळत नाही असा माणूसच या देशात नाही. कारण 105 रुपयात 35 किलो धान्य मिळायला लागलं आहे. घरं, टॉयलेट मोठी यादी आहे.’
‘त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव हा 2014 पासून लोकांना मिळायला लागलं असं कंगना राणौतने म्हणणं हे मोदींच्या कालावधीतील कामांवर खुश होऊन म्हणणं बरोबरही आहे. पण त्यासाठी 1947 सालच्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.