चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/11/chandrakant-patil-750x430.jpg)
मुंबई: सरकार कधी येणार… देवेंद्रजी, आमच्या कानात सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… या चर्चा आता बंद करा. भाजपाच्या दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आपण ठरवलं असून आपण जूनपासून कामही सुरू केलं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्यामुळे भाजपने सरकार पाडण्याचा नाद सोडला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण खूप कामे केली. एसटीच्या आंदोलनात सर्व कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या. त्याचे नेतृत्व भाजपाकडे आले आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटी कामगारांच्या आंदोलनात आहेत. गोपीचंदला पाठवा, सदाभाऊंना पाठवा…अशी गावोगावी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे, असे ते म्हणाले. पंढरपूरची विधानसभा आपण जिंकली. अमित शहांच्या भाषेत सांगायाचे म्हणजे आपण ठोक के विजयी मिळवला. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह होता. त्याचवेळी १५ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात १० हजार पंचायत समित्यांमध्ये आपले सरपंच झाले, असेही त्यांनी सांगितले.
मोदींच्या राजकीय जीवनाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आपण कार्यक्रम दिले. ते राबवले गेले, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी सडकून टीका केली. आज जो जो समाजात क्राईम मानला जातो. तो यांच्या मंत्री किंवा आमदारांच्या नावावर आहे. चोरी ते बलात्कार आणि भ्रष्टाचार हे सर्व गुन्हे तुमच्या कोणत्या ना कोणत्या आमदार आणि मंत्र्याशी जोडले गेले आहेत.
राज्यातील गुन्हेगारीकरणावर आशिष शेलारांनी ठराव दिला आहे. हा ठराव तयार करताना गुन्ह्यांची यादी तयार केली जात होती. तेव्हा मी एकाला म्हटलं, अरे प्रसाद तनपुरे सुटला… त्यांच्यावर पत्रकाराला आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केल्याचा आरोप आहे. त्यांचं नाव घे, असं मी सांगितलं. त्यावर, साहेब, एवढ्या मंत्री, आमदारांवर गुन्हे आहेत की नावं विसरली जातात, असं आपला कर्मचारी म्हणाला. म्हणजे बघा इतकी भयावह परिस्थिती आहे, असंही ते म्हणाले.