शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्परतेने काम केले आहे आणि पुढेही करत राहतील – चंद्रकांत पाटील

7

मुंबई : आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. याबाबत सभागृहात निवेदन देताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने केला आहे. यापूर्वीही अवकाळी पाऊस पडला, तेव्हा शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, अचानक निर्माण झालेली स्थिती आपण सगळे जण पाहत आहोत. या आधीसुद्धा शेतकऱ्यांसंबंधी अगदी तत्परतेने निर्णय घेतले गेले आहेत. प्रामुख्याने आपल्याकडे दुष्काळाची नुकसान भरपाई होते, अतिवृष्टीची भरपाई देणं होतं पण अवेळची नव्हती. हा मंत्रिमंडळाने , माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला कि अवकाळीच सुद्धा नुकसानभरपाई आपण देणार आहोत .

यापूर्वीसुद्धा मागील महिना दीड महिन्यापूर्वी ज्या ज्या वेळेला अवकाळी पाऊस पडला त्या नुकसानीचे पंचनामे करून आपण नुकसान भरपाई दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनडीआरएफ नियमांच्या बदलाची वाट न पाहता एसडीआरएफमध्ये आपण बदल केला. आपण नुकसान भरपाई दुप्पटीच्या जवळ नेऊन ठेवली. २ हेक्टरचे ३ हेक्टर करू ठेवलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात केला.

अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.