राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह विकासकामे तातडीने मार्गी लावा – अजित पवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 293 च्या प्रस्तावावर आपले विचार सभागृहात मांडले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. पुण्याचा विकास हा राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई व इतर शहरांसोबत पुण्याच्या विकासावर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं, असं अजित पवार म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामे रखडली आहेत. राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिला. तसेच पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नसल्याचे सांगत पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असल्याची टीका करत पुणे मेट्रोच्या कामासह दोन रिंग रोडच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्यासह राज्यात अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात ‘प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’च्या माध्यमातून विकासकामांचा आढावा दर पंधरा दिवसांनी घेत होतो. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात सुद्धा राज्यातल्या विकासांची गती कायम राहिली, अशी आठवण अजितदादांनी करुन दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. या शहरांना झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टीवासियांचे योग्य पुनर्वसन करुन विविध माध्यमातून त्यांना पक्की आणि हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुणे आणि नाशिकच्या कनेक्टिविटीसाठी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 800 कोटी रुपयांची तरतूद करुन 90 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. या पुणे-नाशिक रेल्वेचा पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी फायदा होणार आहे, असे अजितदादांनी सभागृहाला सांगितले.

पुणे शहराजवळ 300 एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजिओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरणार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकल्पाला गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!