पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा: जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त, त्यांनी आपल्या काळात राबविलेल्या आदर्श जलव्यवस्थापनाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या संकल्पातून राज्य शासनाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आज सांगली येथे जलसंपदा विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने आयोजित पीक पद्धती, उत्पादकता वाढ, पाणी नियोजन कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीची उत्पादकता वाढवणे, हेच अहिल्यादेवींना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पाणी नियोजनाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन, डॉ. श्रीमंत राठोड, शेतकरी नेते महेश खराडे यांच्यासह जिल्हा पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.