इतिहासाचे महत्त्व कमी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली येथे NCERT कडून इयत्ता ८ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा पराक्रमी इतिहास वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आणि हजारो शिवप्रेमींच्या वतीने ‘मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात आला. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून, शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व हिंदुत्ववाद्यांच्या तीव्र भावनांचे निवेदन राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते स्वीकारले.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘स्वराज्य’ आणि पेशव्यांनी अटकेपार फडकवलेला मराठ्यांचा ‘जरीपटका’ हा केवळ कागदावरचा इतिहास नसून ती आपल्या रक्तातील अस्मिता आहे. हा दैदिप्यमान आणि प्रेरणादायी वारसा पुढील पिढीपर्यंत जसाच्या तसा पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
पाटील पुढे म्हणाले, इतिहासाचे महत्त्व कमी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. या प्रकरणाची मी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, शिक्षण विभाग आणि संबंधित स्तरावर याचा योग्य तो पाठपुरावा करून तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन मी यावेळी सर्व शिवप्रेमींना दिले आहे. आपल्या पूर्वजांच्या देदीप्यमान इतिहासाचे जतन करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत., असे यावेळी पाटील म्हणाले.