आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येत ऊर्जा बचत आणि पर्यायी साधनांचा वापर वाढवणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा नेत्या निता केळकर यांच्या संयोजनातून आज सांगली येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होत असून त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत कोविड काळाप्रमाणेच आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येत ऊर्जा बचत आणि पर्यायी साधनांचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.
पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. देशहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.