महाराष्ट्रात हवा बदल रही है आणि इंदापूरचा त्यात सिंहाचा वाटा – खा. सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी इंदापूर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना सुळे म्हणाल्या ” सत्ताधारी म्हणतात विरोधक शिल्लक राहिला नाही मात्र त्यांच्याच प्रचारासाठी राज्यात बाहेरून नेते मागवले जात आहेत. स्मृती इराणी, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आणखी काही इतर राज्यांचे मुख्यमंत्री आले आहेत. भाजपची अवस्था अशी झाली आहे की परीक्षा तोंडावर आली आहे आणि भीतीपोटी वेगवेगळ्या ट्युशन लावाव्या लागत आहेत.
आजही इंदापूरमध्ये बाहेरून पाहुणे आले आहेत, मात्र त्याने काही फरक पडणार नाही. दत्ता मामांनी प्रचंड विकासकामे केलेली आहेत. मामांची सगळी कामे हि कोट्यावधी रुपयांची आहेत. विरोधात असताना मामांनी इतका निधी आणला आहे तर विचार करा सत्ता आली तर मामा किती मोठा इंदापूरचा विकास करतील. गरिबांना घरे बांधून देण्यासाठीच्या घरकूल योजनेच्या माध्यमातून मामानी कोट्यावधींचा निधी आणून गरिबांना न्याय दिला आहे.
इंदापूरात दुष्काळ पडला, गारपीट झाली पण ना मुख्यमंत्री ना भाजपाचा एकही नेता इथे फिरकला नाही. दादा इथे सात वाजताच दाखल झाले होते. मुख्यमंत्री फक्त इथे एकदा आले तेही मते मागायला, लोकांच्या सुखदुःखात नाही येत तर मग यांना मतदान करायचे तरी कशाला ?
महाराष्ट्रात हवा बदल रही है आणि इंदापूरचा त्यात सिंहाचा वाटा आहे. मामा विकास करण्यासाठी राजकारणात आले आहेत. तुमच्या सुखदुःखात साथ देण्यासाठी राजकारणात आले आहेत. त्यांनी इंदापूरसाठी स्वतःला वाहून घेतले आहे तेव्हा मामांना निवडून द्या. लाखाचा लीड तर मामांना मिळायला पाहिजे.