सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा – संजय राऊत
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/09/sanjayrahut--750x430.jpg)
मुंबई: “आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरु होती.
त्याबाबत आज पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”
सव्वा रुपयाच्या दाव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा चिमटा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असंही ते म्हणाले.