अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2022/01/rahut-1-750x430.jpg)
नागपूर: अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळं नागपूरसह विदर्भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, तूर, कापूस आणि भाजीपाला पिकं उध्वस्त झाली आहेत. त्यामुळं शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, राज्य सरकार मधील मंत्री आणि अधिकारी विदर्भातील शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, त्यांचं विदर्भातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप भाजप नेते आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे, मात्र, अद्याप पंचनाने सुरू झालेले, पालकमंत्री राजकारणात व्यस्त आहेत, अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाही, त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे, असा आरोप करत ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
दरम्यान राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेलं पिक शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या अगोदर राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला होता. तेव्हाच शेतकरी संकटाला सामोरा गेला होता.