मोठी बातमी: ठाकरे सरकार ‘दिवाळी’साठी अनलॉकचं गिफ्ट देणार?
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/10/udhav-cm-750x430.jpg)
मुंबई: देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशासह राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संपुर्ण व्यवसाय, उद्योग-धंदे पुर्णपणे बंद पडले होते. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. उदयोग-धंदे, बाजारपेठा, शाळा महाविद्यालये आणि मंदिरे देखील खुली करण्यात आली आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील कमी झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव, नवरात्री आणि दसऱ्यापाठोपाठ दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात दिवाळी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, मात्र गेली दोन वर्ष राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे मागच्या दोन दिवाळ्यांमध्ये उत्सवात पाहायला मिळाला नाही. पण हळुहळु सणवार लक्षात घेता निर्बंध कमी होऊ लागले आहेत. सध्याची कोरोनीची परिस्थिती लक्षात घेता, दुकानांच्या वेळा, ट्रेनची सवलत पर्यटन आणि ऑफिसेसच्या वेळा याबाबत महत्वाचे निर्णय होऊ शकतात.
राज्यात आता पुन्हा एकदा अनलॉक करून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार सुरक्षित उपाययोजनांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याची माहितीही सुत्रांकडून देण्यात आली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर कोरोना संख्या कशी वाढते याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो.