फडणवीस साहेब तुम्ही जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते – नवाब मलिक

9

मुंबई: शरद पवार यांचे राजकारण संपले आहे, असे देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो. त्यामुळे 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच फडणवीस जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा भाजपची खासदारांची संख्या दोन होती, असा चिमटाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची स्वप्ने खुशाल पाहावी. पण त्यांच्या खासदारांचा आकडा दहाच्या पुढे गेला नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होते. त्यावेळी 1984 साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात का?, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे. पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवारसाहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदीसरकार सत्तेबाहेर जाईल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर हल्ला केला होता. माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.