पुणे : छत्रपती संभाजीमहाराज हे धर्मवीर असण्यावरून मागील महिन्यापासून मोठे राजकारण करण्यात आले. धर्मवीर कि स्वराज्यरक्षक असा नवा वाद सुरु झाला. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते , असा मोठा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावरून राज्यभरात गदारोळ झाला. अजित पवार यांनी माफी मागावी याकरिता भाजपने आंदोलनही पुकारले. या प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे कि, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षणासाठीच लढले, हा इतिहास आहे.
पुणे येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत याबाबत कोणाच्या मनात शंका असेल तर ती त्याच्या मनात असावी कारण लोकशाही आहे. परंतु धर्मासाठी त्यांनी मृत्यू पत्करला हा इतिहास तर ते धर्मवीर नाही हे म्हणणारे सुद्धा नाकारत नाहीत. त्यामुळे त्यांनी जर धर्म बदलायचा ठरवलं असता तर इतके हाल हाल करून त्यांना मारलं नसत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले कि, त्यामुळे ते धर्माच्या रक्षणार्थ जगले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराज असतील त्यांनी देश धर्म आणि संस्कृतीसाठी काम केलेले आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी केले.