मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पुन्हा पत्रसंघर्ष; दरेकर म्हणाले, केंद्राकडे बोट दाखवून पळता येणार नाही

9

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा पत्र संघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी पत्राद्वारे केली होती. आता राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्राद्वारे संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केलीय. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केलाय.

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारचे उत्तर देणे दुर्दैवी बाब आहे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यपाल किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा वाद प्रत्येक ठिकाणी उभा करणे दुर्दैवी आहे. असं काही कारण नाही. ते योग्य ठरत नाही. राज्यपालांनी शेवटी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं आपले मत व्यक्त केले आहे. राज्यपालांनी केलेल्या सूचना सकारात्मक घ्यायला हव्या. आपण विचारलेल्या प्रश्नाला सांगितलेल्या सूचनेविषयी केंद्राकडे बोट दाखवून दूर पळता येणार नाही.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी जर सूचना केली असेल, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर मला वाटतं अशाप्रकारचं अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

हे अधिवेशन केवळ टीका-टिप्पणीसाठी नाही. तर विरोधकही काही योग्य सूचना सरकारला देतील. त्या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबईसारखं आतंरराष्ट्रीय स्तरावरचं शहर सुरक्षित राहील. महाराष्ट्रात सुरक्षित होण्यास मोठी मदत होईल, या भूमिकेतून याकडे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.