राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, फडणवीसांचा मलिकांना टोला
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/10/FADNVIS-1-750x430.jpg)
नागपूर: महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे पोपट आहेत आणि या पोपटात भाजपचा जीव अडकलाय, असं म्हटलं होतं. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपट आहेत आणि ते त्यांना काम नसल्यामुळे बोलत असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी बोलताना नवाब मलिक हे दिवसभर काहीतरी बोलत असतात. सध्या त्यांच्याकडे दुसरं काम नाही, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर देण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी कोण कुणाचा पोपट आहे हे माध्यमांसाठी महत्त्वाचं असेल, आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही, असं म्हटलं.
मलिक नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. येत्या 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील. माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बरेच्या गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पोपटाला वाचवण्यासाठी सर्व लोक पुढे पुढे पळत आहेत. पण विधानसभेत सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही, तसे माझे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :