धर्मांधता, जातीयता दूर ठेवून राजकारण करण्याचा आदर्श अटलजींनी ठेवला – संजय राऊत

मुंबई: आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जंयती आहे. यानिमित्ताने देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृर्तींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. देशाचे नेतृत्व कसे असले पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयींकडे पाहून कळते. धर्माधता आणि जातीयता दूर ठेवून राजकारण करता येते हा आदर्श अटल बिहारी वाजपेयी यांनी देशासमोर आणि सर्व राजकीय पक्षासमोर ठेवला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू होतेॉ. माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम पाहता आलं. त्यांनी देशाचे नेतृत्त्व केलं. पक्षाचं नेतृत्त्व नव्हे. ते देशाचे नेते होते. देशाचं नेतृत्त्व कसं असाव हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे याचा वस्तुपाठ त्यांनी घालवून दिला. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण करणारे ते नेते होते. धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलं, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
शिवसेना आणि भाजपची युती झाली. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं योगदान होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत. आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते, असंही ते म्हणाले. काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले. लाहोरला बस घेऊन गेले, मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली. मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी कारगील युद्धाचा मार्ग स्वीकारला, असं सांगतानाच अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत की त्यांचं स्मरण प्रत्येक जण करतो, असंही त्यांनी सांगितलं.