बारा हजार शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवणाऱ्या बजाज आलियांज विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा – आ. धनंजय मुंडे
चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत बजाज आलियांज या विमा कंपनीने बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे बँकेला कळवून शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
खरीप हंगाम २०२२ मधील विमाधारक शेतकऱ्यांपैकी सुमारे १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १२ कोटी रुपये बजाज आलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते तेव्हा हे अत्यंत अव्यवहारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी नमूद केले.