माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर IT च्या धाडी का? अजित पवारांचा संतप्त सवाल
पुणे: आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील आज (7 ऑक्टोबर) अचानक छापे मारले. यावेळी आयकर विभागाने मारलेल्या या छाप्यांबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर हे सगळे छापे फक्त राजकीय हेतूने मारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि कारखान्यांवर मारलेल्या छापेमारीविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत या हेतून झालेली ही कारवाई आहे असंही अजित पवार म्हणाले.
आयकर विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवर छापे मारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. काहीही संबंध नसताना त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.
आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांवर छापे टाकले आहेत. हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याने आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. “माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण मला एका गोष्टीचं दु:ख आहे की ज्या माझ्या तीन बहिणी ज्यांची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली आणि त्या चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्या तीन बहिणींवर एक कोल्हापूरमधील बहिणीवर आणि दोन पुण्यातील बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या,” असं अजित पवार यांनी सांगितलं.