तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं जसंच्या तसं उत्तर

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेणारं पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तिखट भाषेत उत्तर देणारं पत्रं पाठवलं होतं. त्यावर राज्यपालांनी आपलं उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवरच नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्रं जसंच्या तसं.
तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद 208 नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल. तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे. संविधानाच्या कलम 159 नुसार राज्य घटनेचं संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्यानं त्याला सद्यस्थितीत मंजुरी देता येणार नाही.
आपण सभापती निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी 11 महिने घेतले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 6 आणि 7 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. या सर्वांचा प्रभाव आणि दुरुस्त्यांचे कायदेशीर परीक्षण करणे आवश्यक आहे. मी आतापर्यंत सभागृहाची कार्यपद्धती/ प्रक्रियेसंदर्भात कधीही प्रश्न विचारला नाही. तथापि, संविधानाच्या कलम 208 मध्ये नमूद केल्यानुसार, प्रथमदर्शनी असंवैधानिक आणि बेकायदेशीर वाटणाऱ्या या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.