कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच – किरण माने

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. याचमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यानंतर देखील किरण माने यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात. पण मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूनेही पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्या विरोधात मी पोस्ट करणारच. तो माझा हक्क आहे, असं किरण माने यांनी म्हटलं आहे.
कलाकारांनी राजकारणावर बोलू नये असे काही जण मला सूचवत आहेत. या आधीही अनेक अभिनेते होऊन गेले त्यांनी बरीचशी व्यक्तव्य केली आहेत. भूमिका घेतल्या आहेत. आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार, असं किरण माने म्हणालेत.
देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो, असं किरण माने म्हणालेत.