गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का? कारण…; संजय राऊतांची भाजपवर टीका
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2022/01/YOGI-1-750x430.jpg)
मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी चांगलीच वाढली आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे डावपेच खेळले जात आहेत. तसेच अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत म्हणाले की,योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि भाजपला आगामी निवडणुकीत कोणीही मतदार मत देणार नाही. भाजपचे लोक जर म्हणत असतील की आम्ही बहुमताने निवडून येऊ तर त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला मतदान करायला गंगेत वाहून गेलेले मृतदेह येणार आहेत का? कारण जिवंत लोक योगींना आणि भाजपला मत देणं शक्यच नाही.
अखिलेश यादव यांनी आपलं संपूर्ण लक्ष निवडणुकांवर केंद्रित करायला हवं. भाजरच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांची एकत्रित मोट बांधून निवडणुक लढवायला हवी. उत्तर प्रदेशची जनता अखिलेश यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. आम्हीदेखील निवडणुकीत लढत आहोत. पण परिवर्तन आणायचं असेल तर बिगरभाजप पक्षांनी एकत्रित येऊनच निवडणूक लढवायला हवी, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.
पंतप्रधान मोदींनी कुंभस्नान केलं आणि नंतर दलितांचे पाय धुतले. आता भाजपचे लोक देखील दलितांच्या घरी जाऊ जेवत आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत. अशा लोकांच्या डोक्यातून जातीपातीचं राजकारण कधी जाणार, असा मला प्रश्न पडतो. हे सारं भाजपचं ढोंग आहे. केवळ मतदानासाठी हे राजकारण केलं जातंय, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला.