नागपूर : राज्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदत वाटपास सोमवारी प्रारंभ करण्यात आला. पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलदगतीने कार्यवाही करीत नुकसानाचे पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार राज्य शासनानेही तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली. ही रक्कम अदा करण्यास सुरवात झाली. याबाबतचा प्रातिनिधीक स्वरूपाचा कार्यक्रम सोमवारी विधानभवनाच्या आवारातील मंत्रिमंडळ कक्षात झाला. यावेळी नागपूर जिल्ह्यातील मौदा व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन (डीबीटी) पद्धतीने जमा केली जाईल. ३ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकासाठी २७००० रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकासाठी ३६००० रुपये प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (सार्वजनिक उपक्रम), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.