या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन – जयंत पाटील

8

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे.

या बंदला भाजपकडून विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केलीय. मुंबईत आज जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.

जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.