समाजसुधारकाचा संघर्ष आणि सत्य दाखवणं चुकीचं वाटत असेल, तर दोष सत्याचा नाही तुमच्या दृष्टिकोनाचा – विश्वजित कदम

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित आणि अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा चित्रपट हा आज प्रदर्शित होणार होता पण सेन्सर बोर्डाने काही बदल सुचविले असल्याने आता २ आठवड्यानंतर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये असणाऱ्या संवादांना आणि दृशांना सेन्सर बोर्डाचा विरोध असून विरोधक मात्र या कारणामुळे सरकारला धारेवर धरत आहेत.
राज्यातील काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी या बाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सेन्सर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या पोस्ट मध्ये कदम म्हणतात ‘फुले’ हा चित्रपट केवळ एका महापुरुषाची कहाणी नाही तो सत्याचा आरसा आहे. तो भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची साक्ष आहे. आणि म्हणूनच, काही लोकांच्या मानसिकतेला ‘फुले’ चित्रपट खुपतोय. सेन्सॉर बोर्ड “फुले” चित्रपटावर बदल सुचवतो, पण “काश्मीर फाईल्स” आणि “द केरला स्टोरी” सारख्या द्वेष पसरवणाऱ्या चित्रपटांना मोकळा रस्ता दाखवतो.
महात्मा फुले हे केवळ इतिहासाचे पात्र नाहीत, ते आजच्या भारताची प्रेरणा आहेत. त्यांचं कार्य, त्यांचा विचार हे सत्य आहेत आणि सत्य बदलण्याचा प्रयत्न करणं, म्हणजेच समाज बदलवण्याच्या प्रवाहाला रोखण्याचा कट आहे. आज प्रश्न ‘फुले’ चित्रपटाचा नाही,प्रश्न आहे या देशात सत्य मांडण्याच्या स्वातंत्र्याचा! जर एखाद्या समाजसुधारकाचा संघर्ष आणि सत्य दाखवणं चुकीचं वाटत असेल, तर दोष सत्याचा नाही तुमच्या दृष्टिकोनाचा आहे, हे समजून घ्यावं लागेल.”
“फुले” चित्रपटाच्या माध्यमातून नवा भारत त्यांचा भूतकाळ समजून घेईल आणि हे काही लोकांना अस्वस्थ करतंय असे मत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे.