‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय’

5

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून नेहमीच भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येतंय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून ठाकरे सरकार महाराष्ट्रात काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरुन सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर लोड शेडिंग म्हणजे अंधाराचे संकट कोसळतान दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्याबाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतील उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली का? नागरिकांचा केंद्र सरकारवर विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे व्यापारी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे टीकास्त्र शिवसेनेकडून भाजपवर सोडण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.