शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीही महाविकास आघाडीला कौल दिला आहे – जयंत पाटील

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच्या विचारांचे लोक महाराष्ट्रात निवडून आले आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मताधिक्क्य पाहीले तर संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीमागे मोठ्या प्रमाणात एकसंधपणे उभा आहे, असे ते म्हणाले.
जयंत पाटील पुढे म्हणाले कि, कोकण विभागात महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. प्रचंड मोठ्या धनशक्तीपुढे बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नसला तरी लोकांच्या मनात बाळाराम पाटील कायम राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने उचलून धरले यासाठी राज्यातील तमाम जनतेचे जयंत पाटील यांनी आभार मानले.
पुढे ते म्हणाले की, इंडीया टुडेच्या सर्वेक्षणाची पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रचिती आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतीत महाविकास आघाडी पुढे असतानाच आता शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीही महाविकास आघाडीला कौल दिला आहे. यातून महाराष्ट्राला धोका देणे, महापुरुषांचा अवमान करणे हे महाराष्ट्राने सहन केलेले नाही, असे दिसते. नागपूरच्या जागेवर भाजपचा उमेदवार असता तर तो निवडून आला असता असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, वन मंत्री, केंद्रीय मंत्री या भागातले असतानाही भाजपला उमेदवार मिळू शकला नाही तर इतर भागात भाजपला उमेदवार कसा मिळणार, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला असावा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.