समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई : ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील ठाम आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर सलाईनद्वारे औषध देऊन मारण्याचाही प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस देखील जरांगे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाबाबत बोलताना आवाहन केले आहे कि, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये.

चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले कि, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांवर मार्गक्रमण करणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सर्वाधिक काळ या महाराष्ट्राला मराठा समाजाचा मुख्यमंत्री लाभला आहे. यावरून राज्यात मराठा समाजाचा कायम सन्मान राखला गेला असल्याचे सिद्ध होते. यासोबतच, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. याला अनुसरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये असे मी आवाहन करतो.
पाटील यांनी म्हटले कि, फडणवीसांवर जे आरोप करण्यात आले आहेत ते हास्यास्पद आहेत आणि इतक्या खालच्या लेव्हलचे आहेत हि , महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय संस्कृती नाही त्यामुळे शासन म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्याचा निषेध करतो असे पाटील म्हणाले. १९६० पासून ४ अमराठा मुख्यमंत्री सोडले तर सगळे मराठा मुख्यमंत्री झाले. कोणीही मराठा समाजाला आरक्षण तर सोडाच पण आरक्षण मिळेपर्यंत सुविधा पण नाही दिल्या. २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर केवळ मराठा नाही तर समाजाच्या सगळ्या जातींना, धर्माना, भाषांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. सारथी ची कल्पना देखील फडणवीसांची आहे.
पाटील पुढे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीसांनी घोषणाच केली कि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी बांधील आहे तोपर्यंत जे ओबीसींना ते मराठयांना अशी प्रत्येक गोष्ट त्यावेळी मराठ्यांना दिली. शिक्षणासाठी देखील अनेक सवलती दिल्या. फडणवीसांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकाव यासाठी प्रयत्न केले. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण टिकू शकले नाही. त्यावेळी जरांगे पाटलांनी अंदोलन का केलं नाही असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांनी एवढं सगळं मराठा समाजासाठी केल्यावर त्यांच्यावर दोषारोपण करणं हे कुणाच्या तरी सांगण्यावरुन चाललं आहे. ते सांगणारे त्यांना लखलाभ होवोत आणि त्यांना त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारे त्यांना लखलाभ होवोत. आता समाज जे खरं आहे ते ऐकणार आहे, असे पाटील म्हणाले.
मराठा समाजासाठी तुम्ही आंदोलन करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोतच, पण तुम्ही कोणाच्यातरी सांगण्यावरून ज्या देवेंन्द्रजींनी आजपर्यंत जे कोणाला जमल नाही ते करून दाखवलं त्यांच्यावर आरोप करणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असा थेट इशाराच पाटील यांनी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!