मुंबई : आज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आणि मुलींनी देखील घवघवीत यश मिळवले. यात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले कि, आज १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे निकाल लागले. यात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बारावी हा शैक्षणिक कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा पूर्ण करूनच विद्यार्थ्यांची पुढे वाटचाल सुरू होते. उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करताना आपल्या ठायी असलेल्या कलागुणांचा कल ओळखून आवडत्या शाखेत प्रवेश घ्यावा. घेतलेल्या शाखेत मन लावून अभ्यास करून प्राविण्य मिळवावे. पालकांनीही पाल्याच्या मताचा आदर करून त्याला रुचेल अशा क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी पाठिंबा द्यावा . पाल्याच्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतल्याने ते अधिक मेहनत घेऊन यशस्वी होतील, असा ठाम विश्वास वाटतो, असे पाटील यांनी म्हटले.
पाटील पुढे म्हणाले कि, या परीक्षेत यश प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने, चिकाटीने पुन्हा प्रयत्न करावे, ते नक्कीच यशस्वी होतील यात दुमत नाही!