महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार, यासाठी समिती गठीत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

मुंबई : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने गतीने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. अत्याधुनिक संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
मंत्री आशिष शेलार म्हणाले, आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.