शरद पवार साहेबांचीअ‍ॅलर्जी का? त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत; छगन भुजबळ यांचे पडळकर यांना प्रत्युत्तर

मुंबई: राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक केली यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर राहण्यासाठी आवाहन केल आहे. यावरुन अनेक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्याची महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांची कोणाला अ‍ॅलर्जी असण्याचे काही कारण नाही. शरद पवार केवळ राज्यातीलच नाही तर देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाला राज्यात आणि देशात किंमत आहे. कामगारांची काळजी वाटणे सहाजिक असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आणि सर्वांनीच दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात झालेला गिरणी कामगारांचा संप पाहिला आहे. तो गिरणी संप संपल्याचे आतापर्यंत कोणी जाहीर केले नाही. ते संपकरी आता देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे एवढा अट्टहास करता कामा नये. राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात चूकत असतील तर त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्क शरद पवार यांना आहे. त्यांना काळजी वाटण्याचे सहाजिकच असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!