उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीस तत्वत: मान्यता.. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकणला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाची स्थापन करण्यास बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, हे सागरी विद्यापीठ मेर्वी येथे समुद्रकिनारी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान दिली. रत्नागिरी येथे शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासह जिल्ह्यातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांचा सविस्तर आढावाही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत प्रलंबित कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक कुवारबांव येथे व्हावे ही रत्नागिरीकरांची आणि राज्य शासनाची इच्छा आहे. त्यादृष्टीने स्मारकासाठी आवश्यक जागा संबंधित विभागाने तातडीने हस्तांतरीत करावी, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. स्मारकाचे काम दर्जेदार आणि लोकनेत्यास साजेसे असले पाहिजे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, गृह (परिवहन व बंदरे) विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रत्नागिरीतील संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.