बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं; क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

क्रांती रेडकर हिचे मुख्यमंत्र्याना पत्र

तिने पत्रात म्हटले आहे, मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये, हे या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे.

सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकर आहे. राजकारण मला कळत नाही. आमचा काहीही संबंध नाही. मला त्यात पडायचे नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमची बदनामी करण्यात येत आहे. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीचा टीका करुन खेळ करण्यात येत आहे. माझ्यावर होणारे खासगी हल्ले बाळासाहेब ठाकरे यांनी खपवून घेतले नसते. मला खात्री आहे. मला न्याय मिळेल. माझ्यावर तुम्ही अन्याय होऊ देणार नाहीत. तुमच्याकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुम्ही योग्य न्याय करा, असे तिने पत्रात म्हटले आहे.

यापुढेही समीर वानखेडे तपास करणार !

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास यापुढेही समीर वानखेडे हेच करणार असल्याची शक्यता आहे. एनसीबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एनसीबीच्या पथकाकडून वानखेडे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत वानखेडे यांनी पूरक माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!