स्वतःची मार्केट कमिटी उभारुन शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केल्यास, शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो, हे ओळखून भारतीय जनता पक्षाचे पुणे दक्षिणचे अध्यक्ष आणि दौंड तालुका कृषी उत्पादक आणि प्रक्रिया संस्थेचे संचालक वासुदेवनाना काळे यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी दौंड तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पिकांना युरिया खत वापरल्यानंतर त्यातील बराचसा नत्र लिचींग द्वारे वाया जातो. त्यामुळे मोदीजींनी देशात उत्पादित होणाऱ्या यूरियाला निम कोटींग करुनच पुरवठा विक्री करण्याचे बंधनकारक केले. याचा फायदा आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
पाटील पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या बाहेर देखील आपला माल खरेदी विक्रीची परवानगी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ बाजार समितीवर अवलंबून न राहता, स्वतःची मार्केट कमिटी उभारुन शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केल्यास, शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल, असे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्त केले.