कोल्हापुरात ‘हितैषी समुपदेशन केंद्रा’चा उत्साहात शुभारंभ; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर : बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक व वैयक्तिक आव्हानांवर सुसंवादातून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात ‘हितैषी काऊन्सिलिंग सेंटर’ (समुपदेशन केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या नूतन संस्थेचा उद्घाटन सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.

समाजात बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक व वैयक्तिक आव्हानांवर संवाद आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून सकारात्मक तोडगा काढणे, हा आमच्या या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. कुटुंब व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी आणि महिलांसह सर्व घटकांना आधार देण्यासाठी अशा केंद्रांची आज मोठी गरज आहे. तसेच ‘संवेदना सोशल फाउंडेशन’चा हा सामाजिक उपक्रम अनेक कुटुंबांना नक्कीच मोठा आधार देईल, असा विश्वास मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या सोहळ्याला चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सौ.अंजली चंद्रकांत पाटील, सौ. वर्षा तावडे, डॉ. श्रेया श्रीकांत भारतीय (संस्थापिका, स्वानाथ फाउंडेशन), डॉ. सतीश पत्की (वंध्यत्व निवारण तज्ज्ञ), संगीता बनगीनवार, अॅड. किरण खटावकर (कौटुंबिक कलह निवारण समुपदेशक) आणि श्री. राहुल चिकोडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.