कसब्यातील तपकीर गल्लीत ३,५०० वारकऱ्यांची माऊली सेवा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांचे कौतुक
पुणे : आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर नेहमीच तत्पर असतात. याचाच प्रत्यय पुण्याच्या कसबा पेठेतील तपकीर गल्ली येथे पाहायला मिळाला. येथे ‘विघ्नहर्ता प्रतिष्ठान’ आणि ‘नेहरू तरुण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना व पिंपरी येथून आलेल्या सुमारे ३,५०० वारकरी बांधवांची राहण्याची आणि भोजनाची अत्यंत चोख व उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या या निवासस्थानी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व वारकरी बांधवांशी अतिशय आपुलकीने आणि आस्थेने संवाद साधून त्यांच्या व्यवस्थेची चौकशी केली. वारीच्या काळात अहोरात्र राबून वारकऱ्यांची उत्तम सेवा करणाऱ्या विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि नेहरू तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले व त्यांना पुढील सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे निलेश राऊत, पुष्कर तुळजापुरकर, सुरज क्षीरसागर, योगेश साळुंखे, आशिष शिंदे, संतोष शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.