पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला घरोघरी जाऊन जनसंवाद; नागरिकांच्या भावना घेतल्या जाणून
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाला समर्पित असलेला यशस्वी १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या गौरवशाली निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदारसंघातील देवतुल्य नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला.
या जनसंपर्क मोहिमेदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कसा पोहोचला, याबाबत त्यांच्या थेट भावना आणि अनुभव जाणून घेतले. योजनांचे लाभ मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आणि त्यांनी व्यक्त केलेला दृढ विश्वास हेच माझ्यासाठी सार्वजनिक जीवनात काम करण्याचे सर्वात मोठे बळ आहे, अशा भावना त्यांनी या भेटींनंतर व्यक्त केल्या.
कोथरूडमधील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि याच विश्वासाच्या बळावर मतदारसंघातील विकास, सेवा आणि जनकल्याणाची ही गतिमान वाटचाल आगामी काळातही अधिक वेगाने सुरू राहील. या घरगुती भेटींच्या प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोथरूडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.