नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी निधीअभावी कोणतेही काम रखडू देऊ नये – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरूडमधील राजाराम पूल–डीपी रोड परिसरातील वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी निधीअभावी कोणतेही काम रखडू देऊ नये, असे स्पष्ट निर्देश पाटील यांनी दिले.
डीपी रोडवरील अनधिकृत दुभाजक मार्ग बंद करणे, वाहतुकीचे पुनर्नियोजन, पादचारी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना आणि सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा यांसह विविध कामांना गती देण्याच्या सूचना या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून १५ वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.
या बैठकीस भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, भूमी संपादन विभागाचे बांगर, कार्यकारी अभियंता करपे, टीडीआर सेलचे कार्यकारी अभियंता जे. बी. पवार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे राजेंद्र थोरात, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.