पुणे शहराला २०० कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मानले आभार
पुणे : नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात पुणे शहरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहर आणि उपनगरातील नाल्यांवर सीमा भिंती उभारण्याच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे सर्व पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि संरक्षक भिंती बांधणे यासाठी महापालिकेला निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या संदर्भातील शासन आदेशही प्रसिद्ध झाला आहे. यासाठी गेल्या काळात पाटील यांनी स्वतः अजितदादा यांना पत्र लिहून मागणी केली होती. तसेच, माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनीही यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.
या निधीमुळे विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा सर्वात मोठा फायदा होणार असून, अंबिल ओढा परिसरातील सीमाभिंत उभारण्याच्या कामाला गती मिळेल. तसेच यामुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार असल्याचे पाटील याची म्हटले.