कौशल्य विकासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व आणि नम्रतेसारख्या गुणांचाही विकास होणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे – सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, आज संपूर्ण जग आपल्याकडे कौशल्य आधारित मनुष्यबळ असलेला देश म्हणून मोठ्या आशेने पाहते आहे. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीही नवीन शैक्षणिक धोरण राबवताना कौशल्यावर सर्वाधिक भर दिला आहे. महाराष्ट्र शासनानेही कौशल्य आधारित शिक्षणासाठी वेगळा कायदा केला आहे. त्या अंतर्गत राज्यात विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील. तसेच, संस्थाचालकांनाही कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. कौशल्य विकासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व आणि नम्रतेसारख्या गुणांचाही विकास होणे आवश्यक आहे. कारण संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनीही यावर भर द्यायला हवा, अशी भावना या प्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी सिम्बॉयसिस इंटरनॅशनलचे कुलपती पद्मविभूषण डॉ. मुजुमदार सर, एनएसडीसीचे सीईओ वेदमणी तिवारी, राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू स्वाती मुजुमदार, डॉ. राजेश इंगळे सर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.