‘समतेचा विचार केवळ भाषणात नको, तर कृतीत हवा’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सफाई कामगार आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एकत्र केले महामानवास अभिवादन
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर त्यांनी दिलेल्या ‘समता, न्याय आणि बंधुभावाच्या’ विचारांचे आचरण करण्याची संधी आहे. याच भावनेतून, यंदा महामानवाच्या १३५ व्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिक अभिवादन न करता, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘देवाशिष’ निवासस्थानी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा मंत्र केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो कृतीतून उतरवणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. याच विचाराने, कोथरूडमधील आमचे सफाई कामगार बांधव, कष्टकरी माता-भगिनी, विद्यार्थी आणि उच्चपदस्थ अधिकारी – अशा समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना एकाच छताखाली एकत्र आणून आम्ही महामानवास वंदन केले, असे पाटील यांनी सांगितले.

या मंगलप्रसंगी भन्ते डॉ. हरिषबोधी महाथेरो, भिक्खू हर्षवर्धन थेरो, भिक्खू आनंद मेत्ता, भिक्खूणी धम्म दर्शनी आणि भिक्खूणी महाबोधी मेत्ता यांची उपस्थिती लाभली. यावेळी भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने ‘चिवरदान’ करून कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित सर्व भन्ते व भिक्खू संघाने सर्व अनुयायांना आणि नागरिकांना महामानवाच्या जयंतीनिमित्त पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.