‘युवा संवाद’ उपक्रमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतल्या तरुणांच्या अपेक्षा; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर झाला विशेष विचारविनिमय
पुणे : कोथरूडचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘युवा संवाद’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून कोथरूडमधील तरुण मित्रांशी थेट आणि मनमोकळा संवाद साधला. या बैठकी दरम्यान त्यांनी आजच्या तरुण पिढीच्या अपेक्षा, त्यांचे नाविन्यपूर्ण विचार आणि बदलत्या काळातील शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय आस्थेने जाणून घेतला.
या संवाद सोहळ्यामध्ये देशात लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर (NEP) तरुणांसोबत विशेष विचारविनिमय करण्यात आला. या धोरणाचे महत्त्व पटवून देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण, कौशल्याधारित (Skill-based) शिक्षण, संशोधन व नवनवीन कल्पनांना (Innovation) प्रोत्साहन आणि भारतीय ज्ञानपरंपरेला सर्वोच्च महत्त्व देणारे हे धोरण विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक व्यापक आणि जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देणारे आहे.
तरुणांच्या विचारसरणीचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, केवळ ‘काय शिकायचे?’ एवढ्यापुरते मर्यादित न राहता, ‘शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी कसा करायचा?’ असा व्यापक विचार करणारी आजची कोथरूडमधील युवा पिढी निश्चितच देशासाठी आशादायी आहे. या प्रगतीशील युवा शक्तीच्या सक्रिय सहभागातूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित भारताच्या’ निर्मितीला अधिक बळ मिळेल, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उत्साही युवा संवाद कार्यक्रमाला कोथरूड परिसरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, तरुण उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील तरुण प्रतिनिधी आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.